कोल्हापूर जिल्ह्यात आता पावसाळ्यातही होतेय गुळ निर्मिती

कोल्हापूर : जिल्ह्यात अलीकडील काही वर्षांत पावसाळी हंगामातही गूळ निर्मिती सुरू झाली आहे. जुलै महिन्यापर्यंत अनेक गुऱ्हाळघरे सुरू असतात. गुऱ्हाळघर चालकांनीही मागणी आणि हवामान यानुसार आपल्या कामकाजात बदल केले आहेत. गुळ बारा महिने उपलब्ध असल्याने व्यापाऱ्यांची शीतगृहांची गरजही कमी झाली आहे. पॅकिंगमध्येही बदल झाले आहेत. गुळ निर्मितीसाठी असणारा ऊस कर्नाटकातून आणला जात आहे. कोल्हापुर बाजार समितीत आता वर्षातील दहा महिने गुळाचे सौदे होतात. काही वर्षापूर्वी ऊस हंगाम कालावधीतच गुळ हंगाम अवलंबून असायचा. जिल्ह्यात विशेषत: करवीर, राधानगरी तालुक्यांमध्ये खास गुळासाठी ऊस उत्पादनाची पद्धत होती. उसाचे वाणही तसेच निवडले जायचे. हंगामाची समाप्ती मार्च-एप्रिललाच व्हायची. आता मात्र हा ट्रेंड बदलला आहे.

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे पंचवीस गुऱ्हाळघरे सुरू आहेत. अनेक व्यावसायिकांनी गुळाचे उत्पादन नियमित राहण्यासाठी बंदिस्त शेडमध्ये जळण सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली आहे. कर्नाटकातून ऊस पोहोच होत असल्याने तोडणीच्या दृष्टिकोनातून मजुरांसाठी गुऱ्हाळमालकांना धावाधाव करावी लागत नाही. गुजरातमध्ये गुळाला वर्षभर मागणी असते. त्यामुळे पावसाळी वातावरणातही गुळाची दररोज खरेदी होत आहे. गुळाचे आगर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्वी तीस किलोचे रवे (ढेप) तयार व्हायचे. आता ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन एक किलो,अर्धा किलोचे रवे बनवले जात आहेत. ग्राहकांची छोट्या रव्याना जादा मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here