नवी दिल्ली : भारताने यावर्षी मार्चअखेर पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठले आहे. या क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, भारत आता २०३० पर्यंत ३० टक्के इथेनॉल मिश्रणाचे नवीन लक्ष्य सादर करण्याची तयारी करत आहे. देशाने सुरुवातीला २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य ठेवले होते. परंतु नंतर हा कालावधी इथेनॉल पुरवठा वर्ष २०२४-२५ पर्यंत कमी करण्यात आला. इएसवाय २०२३-२४ मध्ये, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे सरासरी मिश्रण १४.६ टक्क्यांवर होते. आधीच्या २०२२-२३ च्या १२.०६ टक्क्यांच्या तुलनेत ही लक्षणीय वाढ होती. आंतर-मंत्रालयीन चर्चेत, या दशकाच्या अखेरीस राष्ट्रीय मिश्रण लक्ष्य ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्यावर सहमती झाली आहे असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आता २० टक्के लक्ष्याच्या पुढचा पाठलाग आम्ही करीत आहोत असे अधिकाऱ्याने सांगितले.
बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) गेल्या १० वर्षांत इथेनॉलचे मिश्रण करून सुमारे १.२ लाख कोटी रुपयांचे परकीय चलन वाचवले आहे. या प्रक्रियेत १९३ लाख टन कच्चे तेल इथेनॉलने बदलण्यात आले आहे. इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (इस्मा) नुसार, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे गेल्या १० वर्षांत शेतकऱ्यांना १.०४ लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. इस्माचे महासंचालक दीपक बालन यांच्या मते ‘गेल्या वर्षी मिश्रण सुमारे १०-१४ टक्के होते. या वर्षी आम्ही आमच्या उद्दिष्टाच्या सुमारे १९-२० टक्के साध्य केले आहे. आम्ही साखर क्षेत्रातून सुमारे ३५ लाख टन साखर वापरणार आहोत, जे गेल्या वर्षीच्या २१ लाख टनांपेक्षा जास्त आहे. हे आमच्या २०३० च्या उद्दिष्टापेक्षा पाच वर्षे पुढे आहे.












