जळगाव : गोंडखेळ (ता. जामनेर) येथील जामनेर तालुका सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्रीचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून येत्या ३१ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीत त्यावर निर्णय होणार आहे. कारखान्याची उभारणी शक्य नसल्याने हा निर्णय घेतल्याचे कारखान्याचे अध्यक्ष राजू बोहरा यांनी सांगितले.
माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी १९८५ मध्ये या कारखान्याची उभारणी केली होती. जळगाव, जामनेर, पाचोरा व सोयगाव तालुक्यातून यासाठी भाग भांडवल गोळा करण्यात आले होते. जिल्ह्यातील सुमारे १० हजार २५६ शेतकऱ्यांकडून सुमारे २ कोटी ५६ लाखांचे भाग भांडवल जमा करण्यात आले. जिल्हा बँकेने यात त्यांचा हिस्सा कारखान्याकडे वर्ग केला. कारखान्याच्या उभारणीसाठी शिखर बँकेसह एका राष्ट्रीयीकृत बँकेकडूनही अर्थसहाय्य घेण्यात आले. कारखान्यावर जिल्हा बँकेचे १ कोटी ६० लाख इतके कर्ज आहे. ३१ मे रोजी कारखान्याची सर्वसाधारण सभा इंदिरा ललवाणी शाळेत सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी कारखान्याची जमीन, मुख्य इमारत शेड व यंत्रसामुग्री विक्रीबाबत विचारविनिमय केला जाणार आहे.