बेलगाव : एम. के. हुबळी (ता. कित्तूर) येथील मलप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी पुनरुज्जीवन पॅनेलने एकहाती सत्ता काबीज केली. पॅनलचे प्रमुख, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह सर्व १५ उमेदवारांनी विजय संपादन केला आहे. महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, कित्तूरचे आमदार बाबासाहेव पाटील, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पुनरुज्जीवन पॅनलने यंदाच्या निवडणुकीत दंड थोपटले होते. त्यांच्या विरोधात कारखान्याचे माजी चेअरमन नासीर बागवान यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी कामगार कल्याण पॅनेल आणि रयत संघाचे नेते बसवराज मोकाशी यांच्या नेतृत्वाखालील ऊस उत्पादक व कारखाना विकास पॅनेल या दोन पॅनेलनी जोरदार प्रचार करून निवडणुकीत रंग निर्माण केला होता. पण, कारखान्याच्या सभासदांनी पुनरुज्जीवन पॅनेलला पाठिंबा देत सत्तांतर घडवून आणले.
सामान्य गटातून चन्नराज हट्टीहोळी ४७३१ मते, श्रीकांत इटगी ४४२४, शिवनगौडा पाटील ४३४९, शंकर किल्लेदार ४२४५, श्रीशैल तुरमुरी ४१८३, रघु पाटील ३८२९, रामनगौडा पाटील ३७३५, शिवपुत्रप्पा मरडी ३८३८, सुरेश हुलीकट्टी ३६६८ यांनी विजय मिळविला, अनुसूचित जमातीतून भरमाप्पा शिगेहळ्ळी ४१६१, अनुसूचित जातीमधून बाळाप्पा पुजार ३८२७, महिला वर्गातून ललिता पाटील ४०४१, सुनीता लंगोटी ३९१३, अ वर्गातून फकीराप्पा सक्रेन्नवर ४१४२, ब वर्गातून शंकराप्पा होळी ४५०७ यांनी विजय मिळविला.
रविवारी झालेल्या निवडणुकीत ४९.४५ ठक्के मतदान झाले होते. १५ संचालक पदांसाठी एकूण ४४ उमेदवार रिंगणात होते. ३४ मतदान केंद्रांमधील १६,९०३ मतदारांपैकी ८,३५९ शेतकऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर निकाल ऐकण्यासाठी मतदान केंद्रासमोरच गाडीत वाट पाहत बसून होत्या. रात्री उशिरा निकाल जाहीर झाला. खानापूर, कित्तूर आणि बैलहोंगल हे तीन तालुके कार्यक्षेत्र असलेल्या मलप्रभा साखर कारखान्याच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. खानापूर तालुक्यातून कारखान्यावर सहा जणांची संचालकपदी वर्णी लागली आहे. त्यामध्ये आमदार चन्नराज हट्टिहोळी (चिक्कहाँट्टहोळी), श्रीकांत इटगी (चिक्कमुनवळ्ळी), बाळाप्पा पुजार (गंदिगवाड), सुनीता लंगोटी (इटगी), श्रीशैल तुरमुरी (इटगी), ललिता पाटील (चापगाव) यांचा समावेश आहे.