बेळगाव : केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महामंडळाचे संचालक अमित कोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रगतिपथावर असलेला चिदानंद कोरे कारखाना परिसर प्रदूषण मुक्त ठेवला आहे. आवारात नेहमी वृक्षारोपण करून हिरवळ निर्माण केली आहे. यापुढेही हे कार्य सुरू राहणार असून यंदाही परिसरात अधिक वृक्षारोपण केले जाणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांनी सांगितले.
जागतिक पर्यावरण दिन चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्यात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कोरे म्हणाले, प्रदूषण होऊ नये, यासाठी कारखाना नेहमी प्रयत्न करत आहे. पुढेही हे कार्य सुरू ठेवण्यात येणार आहे. आजच्या स्थितीत प्रदूषण रोखणे हे मोठे आव्हान असून आपण त्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनीही आपल्या परिसरात वृक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे, संचालक अजित देसाई, परसगौडा पाटील, मल्लाप्पा म्हैशाळे, चेतन पाटील, भीमगोंडा पाटील, महावीर कात्राळे, अण्णासाहेब इंगळे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.