कर्नाटक : ‘हालसिद्धनाथ’मध्ये आता धान्यापासून उत्पादन इथेनॉल; क्षमता २०० केएलपीडीपर्यंत वाढवणार

बेळगाव : येथील हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्यातील इथेनॉल उत्पादन प्रकल्पाची क्षमता १५० केएलपीडीवरून ती २०० केएलपीडीपर्यंत वाढवली जाईल. विशेष म्हणजे मक्का, तांदूळ या धान्यापासून इथेनॉल निर्मिती होणार असून त्यावर अंदाजे ६० कोटींवर रुपयांचा खर्च होईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी दिली. सोमवारी (ता. ९) कारखाना सभागृहात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष पाटील बोलत होते.

एम. पी. पाटील म्हणाले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कारखान्यात ५ फेब्रुवारी २०२४ पासून इथेनॉल निर्मितीस सुरुवात झाली. इथेनॉलसाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरले असून दररोज १ लाख ५० हजार लिटर इतके उत्पादन सुरू आहे. यामुळे थेट कारखान्याला लाभ होत आहे. आतापर्यंत कारखान्यात ३ कोटी ४७ लाख लिटर इथेनॉल उत्पादन झाले आहे. त्यापैकी ३ कोटी ४ लाख लिटर इथेनॉलची आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल, एमआरपीएल आदी कंपन्यांना विक्री झाली आहे. विक्रीपोटी १८९ कोटी ५४ लाख रुपये कारखान्याला मिळाले आहेत. सध्या ४१ लाख ६४ हजार ५४५ लिटर इथेनॉल शिल्लक आहे, तर १७ लाख २९ हजार लिटर इतके उत्पादित होईल, एवढे मोलॅसिस शिल्लक आहे.

उपाध्यक्ष पवन पाटील म्हणाले, इथेनॉल उत्पादन वाढीसाठी पाऊल टाकत असल्याने कारखान्याला लाभ मिळेल. परिणामी मक्का, तांदूळ आदी उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मागणी वाढेल. बामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती येणार आहे. कारखान्याचा आर्थिक ताळेबंद सुधारल्यास निश्चितपणे शेतकऱ्यांच्या उसाला आणखी चांगला दर देता येणार आहे. यावेळी कार्यकारी संचालक अप्पासाहेब शिरगावे, संचालक अप्पासाहेब जोल्ले, अविनाश पाटील, विश्वनाथ कमते, रामगोंडा पाटील, रावसाहेब फराळे, जयवंत भाटले, राजू गुंदेशा, रमेश पाटील, विनायक पाटील, किरण निकाडे, सिध्दू नराटे, सर्जेराव पाटील, अरुण पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here