बेळगाव : शेतकऱ्यांची उसाची थकीत बिले देण्यासाठी कारखान्यांना साखर निर्यात करण्यास परवानगी दिल्यास समस्या निर्माण होणार नाही. मात्र, काही कारखान्यांना परवानगी मिळत नसल्याने काही कारखान्यांना शेतकऱ्यांची शिल्लक बिले देण्यास अडचणी आल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने साखर निर्यात करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी दिली. शनिवारी येथील एस. निजलिंगप्पा साखर संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री शिवानंद पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने साखर निर्यात करण्यास अनुमती दिल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याची मदत होईल. ऊस बिले देण्यासाठी साखर कारखान्यांकडे स्वतंत्र भांडवल नसते. केंद्र सरकारने याची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या दृष्टीने पूरक उपाययोजना हाती घ्याव्यात, असा आग्रह राज्य सरकारने केला आहे असे ते म्हणाले. केंद्राने तुरीची आयात करण्यास परवानगी दिली आहे. राज्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे तुरीचा दर प्रती किलो ९० रुपयांपर्यंत घसरला आहे. राज्यात कांदा आणि टोमॅटोचा दर घसरल्याने शेतकऱ्यांवर ते रस्त्यावर टाकण्याची वेळ आली आहे. याबाबत केंद्र सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली.