बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात यंदाचा ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. उसतोड मजुरांना आता परतीचे वेध लागले आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऊस दराबाबत शेतकरी संघटना, रयत संघटना, हशिरू सेना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी छेडलेल्या आंदोलनामुळे उशिरा गळीत हंगाम सुरू झाला होता. कारखान्यांनी ३३०० ते ३४०० व शासनाने प्रतिटन ५० रुपये दर दिला आहे.
कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्राचा वापर केल्याने कामे गतीने झाली आहेत. तोडणीसाठी परराज्यातून बैलगाड्यांसह ऊसतोड मजूर कमी प्रमाणात दाखल झाले आहेत. त्यामुळे कारखान्यांना यंत्राचा वापर करावा लागला आहे. अंतिम टप्प्यात परिसरातील बऱ्याच क्षेत्रातील ऊस जाळून तोडला जात आहे. त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत हंगाम संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

















