बेळगाव : शिरगुप्पी शुगर वर्क्स कारखान्याच्या कार्यस्थळावर १४ व्या ऊस गाळप हंगामाचा सांगता समारंभ झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिरगुप्पी शुगर वर्क्सचे अध्यक्ष, माजी आमदार कल्लापण्णा मगेण्णावर होते. ते म्हणाले, साखर कारखान्यांना उर्जितावस्था मिळण्यासह ऊस उत्पादकांना चांगला दर मिळावा यासाठी प्रयत्नाची गरज आहे. केंद्र शासनाने साखर, इथेनॉलसह अन्य उपपदार्थांना चांगला दर दिल्यास ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारी टिकेल, असे मत कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रमेश दोड्डण्णावर यांनी व्यक्त केले.
सांगता समारंभात व्यासपीठावर कारखाना व्यवस्थापक अरुण फरांडे, के. पी. मगेण्णावर, लक्ष्मी सोहार्द संघाचे अध्यक्ष शीतल मगेण्णावर, मुख्य शाखाधिकारी प्रदीप मगेण्णावर, सागर मंगसुळे, शेती अधिकारी महावीर बिरनाळे उपस्थित होते. या गाळप हंगामात कारखान्यांतर्गत विविध घटकांनी यशस्वी प्रयत्न केल्याने कारखान्यातर्फे त्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानीत केले. शिरगुप्पी शुगर वर्क्सचे अध्यक्ष कल्लापण्णा मगेण्णावर म्हणाले की, यंदा अति पाऊस झाल्याने ऊस उत्पादनात कमालीची घट झाली आहे. गाळप उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेती विभाग, ऊसतोड मजूर, शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा करण्यास सहकार्य केले आहे. कौतुक मगेण्णावर, प्रवीण चौगुले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते. वीरेंद्र जाडर यांनी आभार मानले.


















