बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा तंबाखू पिकाचे क्षेत्र २०० हेक्टरने घटले आहे. केंद्र व राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांचा परिणाम व जनजागृतीमुळे दरवर्षी तंबाखू पीक उत्पादन लागवड क्षेत्रात घट होत असून दुसऱ्या बाजूला उसाचे क्षेत्र वाढत आहे. निपाणी तालुका हा तंबाखू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अकोळ, गळतगा, खडकलाट, ममदापूर के एल परिसराला तंबाखूचे माहेरघर म्हटले जाते. अनुकूल वातावरणामुळे तंबाखू पिकाकडे शेतकऱ्यांचा कल आहे. आता केवळ ७०० हेक्टरवर तंबाखू पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. उत्पादनच कमी मिळत असल्याने तंबाखूचा दर वाढू लागला आहे.
निपाणी तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र २०० हेक्टरने वाढून १० हजार हेक्टरपर्यंत गेले आहे. पारंपरिक तंबाखू पिकाच्या उत्पादनाचा पट्टा म्हणून निपाणीसह चिकोडी भाग ओळखला जात असून कृषी खात्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून तंबाखू पीक उत्पादनात विषयीची मानसिकता बदलवण्याचा यशस्वी प्रयत्न चालवला आहे. यावर्षी या पिकाच्या उत्पादन क्षेत्रात वाढ होणार की नाही हे निसर्गावरच अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा तंबाखू पिकाकडे कल कमी झाला आहे. तंबाखूच्या दुष्परिणामाबाबतही जागृती करण्यात येत असल्याने शेतकरी इतर पिकांकडे वळत आहेत. तसेच तंबाखूपेक्षा इतर पिकांतून उत्पन्न अधिक मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपला मोर्चा पर्यायी पिकांकडे वळविला आहे.