अहिल्यानगर : केदारेश्वर कारखाना कष्टातून उभा राहिला आहे. राजकारणाचा कधी विचार केला नाही म्हणून, तर हा कारखाना जागेवर आहे. ही संस्था टिकली, तरच या भागाचा विकास होईल असे प्रतिपादन बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे यांनी केले. बोधेगाव येथे कारखान्याच्या २८ व्या गळीत हंगामाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, कर्मचारी कारभारी जावळे व त्यांच्या पत्नी द्वारकाबाई यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन झाला. तहसीलदार आकाश दहाडदे यांच्या हस्ते गळीत हंगामांचा प्रारंभ पार पडला.
माजी अध्यक्ष ढाकणे म्हणाले की, शेवगाव तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यात काहींनी शेतकऱ्यांची पिळवणूक केली. आजही काहीजण कारखान्यांचे खाजगीकरण करत आहेत. पण सध्या केदारेश्वर कारखान्याना आपले वेगळेपण टिकवून आहे. आमचे १२ हजार सभासद, ८ हजार ऊसतोड कामगार विविध जातीधर्मातील आहेत. त्यांना आम्ही कुटूंब मानतो. मी आहे, तोपर्यंत या संस्थेला आर्थिक अडचण येऊ देणार नाही. महाराष्ट्रात सर्वात कमी कर्ज असलेला हा कारखाना आहे. राज्यात ३८ कारखान्यांकडे एफआरपीप्रमाणे २०० कोटी रुपये थकीत आहेत. मात्र, आपली संस्था आर्थिक संकटातून बाहेर पडली आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष माधव काटे, डॉ. प्रकाश घनवट, त्रिंबक चेमटे, सुरेश होळकर, रणजित घुगे, अश्विनकुमार घोळवे, रमेश गर्जे, तीर्थराज घुंगरड आदी मान्यवर उपस्थित होते. शरद सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रकाश घनवट यांनी आभार मानले.

















