कोल्हापूर : दौलत साखर कारखान्याचा २०१०-११ चा हंगाम तासगावकर शुगर्सने घेतला होता. हंगामात ५० टक्के एफआरपीची रक्कम मिळाली नाही. या रकमेची जबाबदारी ‘अथर्व’ने घेतली आहे. ही थकीत ऊस बिले व्याजासह तत्काळ द्यावी, अशी मागणी दौलत बचाव कृती समितीने केली आहे. याबाबत सभासद शेतकऱ्यांची पाटणे फाटा येथे बैठक झाली. थकीत एफआरपी व्याजासह ९२ कोटी होते. ही रक्कम अदा करण्याचे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालकांनी दिले आहेत. असे असतानाही ‘अथर्व’ने कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे कंपनीने व्याजासह ९२ कोटींची रक्कम अदा करावी, अन्यथा आंदोलन उभारू, असा इशारा देण्यात आला.
याबाबत ॲड. एन. एस. पाटील, सुभाष देसाई, तानाजी गडकरी, पांडुरंग बेनके आदींनी सांगितले की, अथर्व समुहाने २०१९ ला कारखाना ताब्यात घेतला. त्याआधी २०१०-११ हंगामात तासगावकर शुगर्सकडील साखर जप्त करून तिची विक्रीतून आलेल्या रकमेतून अर्धी एफआरपी देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार उर्वरित पैसे बेळगावमधील सह्याद्री व नवहिंद पतसंस्थांना दिले. अथर्व समुहने कारखाना चालविण्यासाठी घेताना या एफआरपीची जबाबदारी घेतली होती. त्याची आता तातडीने पूर्तता करावी.