कोल्हापूर : राजाराम साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाचे व को- जनरेशनचे काम पूर्णत्वास आले आहे. कारखान्यात जवळपास ८० ते ८५ टक्के नवीन मशिनरी बसविण्यात आली आहे. कारखान्याच्या चिमणीची उंची ८२ मीटर आहे. या चिमणीतून राख बाहेर पडणार नाही. यंत्रणेद्वारे ही राख खालच्या खालीच खेचली जाणार आहे. त्यामुळे आसपासचा परिसर दूषित होणार नाही. कारखान्याचा चालू २०२५-२६ चा गळीत हंगाम येत्या डिसेंबरच्या अखेरीस सुरू होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन, आमदार अमल महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आमदार महाडिक म्हणाले की, कारखान्याचा गळीत हंगाम काहीसा लांबला असला तरी उसाची रिकव्हरी यंदा चांगली मिळण्याची शक्यता आहे. गळीत हंगामाची तयारी म्हणून कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन नुकताच झाला आहे. यंदा कारखान्याचे विस्तारीकरण हाती घेतले. परंतु मे महिन्यात सुरू झालेला पाऊस नोव्हेंबर महिना उजाडला तरी पडत होता. त्यामुळे विस्तारीकरण आणि को. जनरेशनच्या कामात अडथळे आले. या कामात ७०० हून अधिकहून अधिक कर्मचारी गुंतले आहेत. कारखान्याकडे जागा कमी आहे. तरीही कमी जागेत विस्तारीकरण आणि को- जेनरेशनचा प्रकल्प पूर्णत्वास नेला जात आहे. यावेळी कारखान्याचे संचालक दिलीप पाटील उपस्थित होते.


















