कोल्हापूर : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) गळीत हंगामाला गती आली आहे. दैनंदिन सुरू असलेल्या गाळपाबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिलेही जमा करण्यात येत आहेत. चालू गळीत हंगामात १६ ते ३१ डिसेंबर २०२५ या पंधरवड्यामध्ये गळीतास आलेल्या उसाली बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहेत. ऊस पुरवठा केलेल्या सभासद, बिगर सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस बिलाची रक्कम संबंधित बँकेशी संपर्क साधून उचल करावी, असे आवाहन कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी केले आहे.
नलवडे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने १६ ते ३१ डिसेंबर या पंधरवड्यात ३,९५,६९,५०६ मे. टन इतक्या उसाचे गाळप करण्यात आले. या गाळपापोटी एकरकमी प्रती टन ३,४०० रुपयांप्रमाणे होणारी एकूण रक्कम १३ कोटी ४५ लाख ३६ हजार ३५३ रुपये शुक्रवारी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर विनाकपात जमा केलेली आहे. कारखाना प्रशासन केडीसीसी बँकेच्या सहकार्याने वेळच्या वेळी ऊस बिले, तोडणी वाहतूक बिले, हंगामी कंत्राटदारांची बिले, कर्मचारी पगार देत आहे. जास्तीत जास्त ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांनी ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी संचालकांनी केले आहे.

















