कोल्हापूर : शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यावतीने इंगळी येथील बसवेश्वर देवस्थानात आयोजित ऊस पीक चर्चासत्र व शेतकरी मेळावा झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे मार्गदर्शक, माजी अध्यक्ष गणपतराव पाटील होते. त्यांनी शेतकऱ्यांना ऊस पिकाच्या पंचसूत्रीबाबत मार्गदर्शन केले. ऊस पिकाच्या जास्त उत्पादनाच्या आशेपोटी रासायनिक खते, पाण्याचा जास्त वापर करून शेतीची सुपिकता बिघडत आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी करून सुपीक जमीन क्षारपड बनवू लागला आहे. शेतकऱ्यांनी पंचसूत्रीचा अवलंब करावा. सुधारित बियाणे, पाणी, जैविक खताचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिरगुप्पी शुगरचे अध्यक्ष, माजी आमदार कल्लाप्पाण्णा मगेण्णावर, दत्त कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथराव पाटील, उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, संचालक अमर यादव, इंद्रजित पाटील, ज्योतिकुमार पाटील, प्रीती देशमुख, तुषार शितोळे उपस्थित होते. इंगळी पीकेपीएसचे अध्यक्ष राजाराम माने यांनी स्वागत केले. मान्यवरांनी दिवंगत माजी आमदार सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञ प्रीती देशमुख, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ तुषार शितोळे यांनी ऊस पिकावरील कीड व हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकाचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. कारखान्याचे अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, ए. एस. पाटील, अमर चौगुले यांच्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.