कोल्हापूर : ‘एआय’मुळे एकरी ३० टक्के खर्चात बचत होऊन एकरी २०० टन उत्पादन मिळू शकते. ऊस उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण, बियाणे, खताचे नियोजन, ठिबक सिंचन तसेच कीड रोग याबाबत कृत्रिम बुद्धिमत्तेनुसार नियोजन करावे लागेल, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे कृत्रिम बुद्धिमत्ता विशेष तज्ज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी केले. कुंभी सहकारी साखर कारखान्याच्यावतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कुंभी कारखाना अध्यक्ष, आमदार चंद्रदीप नरके, कुंभी बँक अध्यक्ष अजित नरके, कारखाना उपाध्यक्ष राहुल खाडे उपस्थित होते.
डॉ. भोईटे म्हणाले की, ‘शेतीत बदल ही काळाची गरज आहे. नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या पुढे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्ता अवलंबावी लागेल. तरच उसाच्या शेतीत एकरी ३० टक्के बचत होऊन मागील उत्पन्नात ३० टक्के वाढ होईल. या तंत्रज्ञानामुळे एकरी २०० टन उत्पादन शक्य आहे.आमदार चंद्रदीप नरके यांनी कुंभी कारखाना येथे वेदर स्टेशन बसविले जाणार आहे असे जाहीर केले. ते म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या धोरणामुळे कारखाने अडचणीत असल्याचे सांगून एफआरपी वाढली पाहिजे. शेतकऱ्याचे उत्पन्नही वाढले पाहिजे. शेतकऱ्यांनी शेती विकू नये. ती टिकली पाहिजे उत्पादन वाढले पाहिजे. यावेळी डॉ. भोईटे यांनी एआय तंत्रज्ञानावर सेंद्रिय शेतीचे नियोजन असल्याचे सांगून, स्लाईड शो व वेदर स्टेशन दाखवून कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कार्यकारी संचालक धीरज कुमार माने यांनी आभार मानले. संचालक अॅड. बाजीराव शेलार, संजय पाटील, उत्तम वरुटे, विलास पाटील, दादासाहेब लाड, सरदार पाटील, रवींद्र मडके आदी उपस्थित होते.