कोल्हापूर : जवाहर शेतकरी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील तळंदगे (ता. हातकणंगले) येथे जवाहर सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून संचालक, सभासद व शेतकरी अशा १२१ जणांना बारामती येथील कृषी विकास केंद्रात एआय तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून चारशे एकरवर स्वयंचलित ठिबक सिंचन योजना उभारले आहे. त्या माध्यमातून आधुनिक एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातन ऊस शेतीसाठी त्याचा वापर केला जाणार आहे.
या योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञान वापरलेले भूखंड भेटी व प्रशिक्षणासाठी बारामती येथील कृषी विकास केंद्रात पाठविण्यात आले आहे. दोन बसच्या माध्यमातून संस्थेने ही सोय केली आहे. शेतकऱ्यांना माती, पाणी, कीड रोग व हवामान याचा अंदाज अगोदर देणे. पीक वाढीच्या कालावधीनुसार आवश्यक पाणी, खते, अन्नद्रव्याची माहिती संबंधित शेतकऱ्यांना मोबाईलवर मिळते. याचा हेक्टरी खर्च २५ हजार रुपये आहे. त्यातील ५० टक्के रक्कम कारखान्याकडून अनुदान स्वरुपात देण्यात येणार असून, उर्वरित ५० टक्के रक्कम बिनव्याजी कारखाना देणार आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक म. गो. जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.