कोल्हापूर: हमीदवाडा येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात आजअखेर ९५ दिवसांमध्ये ४ लाख ४४ हजार ३८५ मे. टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्यात ४ लाख ७४ हजार ४२० क्विंटल साखर पोती उत्पादन झाले आहे. तसेच सरासरी साखर उतारा १२.३० टक्के इतका आहे. कारखान्याने १ ते १५ जानेवारी या कालावधीत गाळपास आलेल्या ७०, ४९४ मे. टन उसाची प्रती टन ३,४१० रुपये याप्रमाणे होणारी ऊस बिलाची २४ कोटी ९३ लाख ८७ हजार ९४८ रुपये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहेत, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन संजय मंडलिक यांनी दिली.
चेअरमन संजय मंडलिक यांनी कारखान्याचे सर्व ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद, तोडणी कंत्राटदार, वाहतूकदार, कारखान्यातील सर्व अधिकारी कामगार, कर्मचारी यांच्या सहकार्याने गाळप हंगाम सन २०२५ – २६ हा यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले. कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून १,५७,७४,३०० युनिटस् वीज निर्यात केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्हाईस चेअरमन आनंदा फराकटे, संचालक वीरेंद्र मंडलिक, शिवाजीराव इंगळे, प्रकाश पाटील, विश्वास कुराडे, कृष्णा शिंदे, तुकाराम ढोले, पुंडलिक पाटील, महेश घाटगे, मंगल तुकान, प्रतिभा पाटील, धनाजी वाचणकर, प्रदीप चव्हाण, नंदिनीदेवी घोरपडे, विष्णू बुवा, नेताजी पाटील, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील आदी उपस्थित होते.


















