कोल्हापूर : टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील ‘श्री गुरुदत्त शुगर्स’ने नेहमीच उच्चांकी ऊस दराची पंरपरा कायम राखली आहे. गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्यास गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३४०० रुपये विनाकपात देणार आहे. तसेच हंगाम समाप्तीनंतर केंद्र शासनाच्या एफआरपी व आरएसएफ धोरणाप्रमाणे जो दर निघेल तो शेतकऱ्यांना देण्यास बांधील असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी दिली.
ते म्हणाले, ‘श्री गुरुदत्त शुगर्स’ने नेहमीच शेतकरी हित केंद्रस्थानी ठेवून स्वच्छ व पारदर्शी कारभार केला आहे. नैसर्गिक आपत्तीत व शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात कारखाना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून पाठबळावर श्री गुरुदत्त शुगर्सची यशस्वी वाटचाल सुरू आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठबळावर कारखान्याने आतापर्यंत २१ गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. शेतकरी आणि कारखाना ही साखर उद्योगाची दोन महत्त्वाची चाके असून ती व्यवस्थित चालली तरच साखर कारखानदारी टिकणार आहे. त्यामुळे गळीत हंगाम वेळेत सुरू होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याला नोंद केलेला सर्व ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे.’












