कोल्हापूर : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपून तीन-चार महिन्यांचा कालावधी संपला असला, तरी अद्याप शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पैसे मिळालेले नाहीत. जवळपास १३५ कोटी रुपये थकीत आहेत. ते व्याजासह द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे करण्यात आली. याचबरोबर खतांचे लिंकिंग थांबविण्याचीही मागणी करण्यात आली.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, धनाजी पाटील, बाळासाहेब पाटील, राजाराम देसाई, सचिन शिंदे, संपत पवार, बंडू पाटील, सुधीर मगदूम, तानाजी वठारे, विशाल चौगुले, आण्णा मगदूम, आप्पा एडके, विक्रम पाटील यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, युरिया व इतर खतांची टंचाई भासवून लिंकींग केले जात आहे. कृषी विभाग केवळ कारवाईचा फार्स करत असून, लिंकींगची सक्ती करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करावी. मागील गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे १३५ कोटी थकीत एफआरपीची रक्कम आहे. हे पैसे व्याजासह पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे. याबाबत पालकमंत्री आबिटकर यांनी थकीत एफआरपीबाबत
संबधितांवर महसुली कारवाई करण्यास भाग पाडू, अशी ग्वाही दिली.