कोल्हापूर : शाहूनगर-परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात १६ ते ३० नोव्हेंबरअखेर गाळप झालेल्या उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहेत. नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात गाळप झालेल्या ६६, २६३ मे. टन उसाच्या बिलापोटी २४ कोटी २० लाख ६०८०२ रुपये उत्पादकांच्या खात्यावर जमा केलेले आहेत अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली. कारखान्याने यावर्षी जाहीर केलेला प्रती टन ३६५३ रुपये दर हा राज्यात उच्चांकी आहे. यावर्षीच्या हंगामात ६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्ष पाटील म्हणाले की, यंदाच्या हंगामात कारखान्याने दि. २९ डिसेंबर अखेर ४९ दिवसांत २ लाख १७ हजार ७०० मेट्रिक टन ऊस गाळप करून २ लाख ५१ हजार १४० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सरासरी साखर उतारा ११.६२ टक्के एवढा आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपण उत्पादित केलेला सर्व ऊस कारखान्याला पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक सागर पाटील, जनरल मॅनेजर संजय पाटील व अधिकारी उपस्थित होते.
















