कोल्हापूर : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने कारखान्याने २ फेब्रुवारीअखेर तीन लाख ८१ हजार २७० टन उसाचे गाळप करून तीन लाख ५२ हजार ९५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. चालू गळीत हंगामातील गळीत हंगामातील १६ ते ३१ डिसेंबर या पंधरवड्यात गाळप केलेल्या ७५,६०६ टन उसाचे ३,४५० रुपयांप्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम २६ कोटी ८ लाख ४२ हजार संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील यांनी ही माहिती दिली.
अध्यक्ष पाटील म्हणाले की, कारखान्याचा डिस्टीलरी व को-जनरेशन प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहे. कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून या हंगामात आजअखेर तीन कोटी ४४ लाख ७५ हजार ८५६ युनिट विजेची निर्मिती केली आहे. कारखाना वापर वजा जाता दोन कोटी २६ लाख ९७ हजार युनिट वीज निर्यात केली आहे. कारखान्याने गाळपाच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांनी संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवून सहकार्य करावे. यावेळी कारखान्याचे संचालक, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सचिव नंदकुमार पाटील आदी उपस्थित होते.

















