कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या ऊस विकास योजनेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर

कोल्हापूर : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामार्फत कृषी विज्ञान केंद्र, बारामतीच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२५-२६ पासून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान आधारित नवीन ऊस विकास योजना राबवली जाणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. योजना दोन टप्प्यांमध्ये राबविली जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान ऊस पिकामध्ये वापरताना येणाऱ्या भौगोलिक निकषानुसार ऊस पीक तंत्रज्ञान योजना व या तंत्रज्ञानाच्या भौगोलिक निकषात न बसणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक ऊस प्लॉट योजना असे याचे स्वरुप असेल.

अध्यक्ष नाविद मुश्रीफ म्हणाले की, कारखान्यामार्फत ए. आय. तंत्रज्ञान वापरासाठी प्राथमिक एकरी १०,००० रुपये खर्चासोबत ऊस बियाणे, माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खते व संशोधन केंद्रमार्फत खते शेतकऱ्यांना बिनव्याजी क्रेडिटवर पुरविल्या जाणार आहेत. नामांकित कंपन्यांचे गुणवत्तापूर्ण आयएसआय ठिबक सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकरी १०,००० रुपये अनुदान दिले जाईल. नॉन आयएसाय ठिबक संच बसवणाऱ्या शेतकऱ्यांनाही एकरी ५००० रुपये अनुदान मिळेल. योजनेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी शेती विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन अध्यक्ष मुश्रीफ यांनी केले. यावेळी जनरल मॅनेजर संजय श्यामराव घाटगे, मुख्य शेती अधिकारी गोकुळ मगदूम, उत्तम परीट आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here