लातूर : गेल्या गळीत हंगामातील उसाला ३००० रुपये मेट्रिक टनाप्रमाणे भाव द्यावा, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाकडे केली आहे. पण बोलल्याप्रमाणे २७५० चा दर पूर्वीच दिला असून आता बिल देता येणार नाही, असे कारखान्याचे चेअरमन बाबूराव धोत्रे-पाटील यांनी सांगितले आहे. निलंगा मतदारसंघात दोन साखर कारखाने आहेत. डॉ शिवाजीराव पाटील-निलंगेकर सहकारी साखर कारखाना (अंबुलगा) हा ओंकार शुगरने चालवण्यासाठी घेतला. हा कारखाना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला पाठवला आहे.
याच मतदारसंघातील खासगी तत्त्वावरील जागृती शुगर्स कारखान्याने ३००० हुन अधिकचा प्रति मेट्रिक टन जाहीर केलेला भाव शेतकऱ्यांना अदा केला. जागृतीने दिलेल्या भावाप्रमाणे अंबुलगा कारखान्याने दर द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाला निवेदन देऊन केली आहे. दिलेल्या निवेदनावर सिध्देश्वर सावंत, गोविंद शिंदे, संजीव सावंत, उद्धव सावंत, बाळासाहेब ढगे, भागेश्वर सावंत, नीळकंठ लाटे, बालाजी बोंडे, विश्वनाथ लाटे, पंडित सूर्यवंशी, सोपान शिंदे, विश्वंभर सावंत, कांत शिरपुरे, मीना साळुंके, रणजित सावंत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.