लातूर : जय जवान, जय किसान साखर कारखाना कधी सुरू होणार ? शेतकऱ्यांचा सवाल

लातूर : गेल्या १५ वर्षांपासून येथील जय जवान, जय किसान सहकारी साखर कारखाना बंद आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. कारखाना चालू होणार अशी चर्चा दरवर्षी होते. प्रत्यक्षात काहीच होत नाही. कारखान्याचा यावर्षी तरी बॉयलर पेटणार का? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. माजी गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या संकल्पनेतून नळेगाव येथे १९८४ मध्ये कारखाना उभारण्यात आला. कारखाना ३० वर्षे सुरळीत सुरु होता. मात्र, पंधरा वर्षांपासून कारखाना काही तांत्रिक कारणामुळे बंद पडला. सध्या तो महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात आहे. कारखान्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज आहे.

कारखान्याला जवळपास ३०० एकर जमीन आहे. कारखान्यात तीनशे कामगार होते. दहा हजार शेतकरी सभासद, २९८ गावे, सात तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेला, १२,५०० मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला जय जवान, जय किसान साखर कारखाना जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. कारखाना बंद असल्यामुळे चाकूर, अहमदपूर, उदगीर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. साखर कारखाना चाकूर-अहमदपूर विधानसभा मतदारसंघात येतो. मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील सध्या सहकारमंत्री आहेत. त्यामुळे १५ वर्षांपासून बंद पडलेला कारखाना चालू होईल, अशी अपेक्षा या भागातील शेतकरी सभासदांना आहे. याबाबत कामगार संघटनेचे उपाध्यक्ष गोविंद सावंत यांनी सांगितले की, कारखाना चालू होणे गरजेचे आहे. कोण चालवणार आहे. यापेक्षा कारखाना चालणे महत्त्वाचे आहे. कारखाना चालू झाल्यानंतर शेतकऱ्यांचे, कामगारांचे हित साधले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here