लातूर : मांजरा उद्योग समुहातील साखर कारखान्यांनी हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणीवर भर दिला आहे. यंदा मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ऊसतोड शंभर टक्के हार्वेस्टरद्वारे होईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी गुरुवारी दिली. लातूर येथील मांजरा शेतकरी कारखान्याचे रोलरचे पूजन दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते व लातूरचे माजी पालकमंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता. ५) करण्यात आले. त्यानंतर संचालक मंडळाची गळीत हंगाम आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना मालकीचे सध्या ८ हार्वेस्टर आहेत. आगामी हंगामासाठी आणखी १७ हार्वेस्टर घेतले जातील. कारखाना हमीवर लातूर जिल्हा बँकेमार्फत दिलेले ४३ आणि इतर अशा एकूण ८० हार्वेस्टरद्वारे ऊसतोडीचा निर्णय झाला आहे. आगामी गाळप हंगामामध्ये कारखान्याने ९ लाख मॅट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, ‘ट्वेंटी वन शुगर’चे उपाध्यक्ष विजय देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले, मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, कारखान्याचे संचालक श्रीशैल उटगे, सचिन पाटील, रेणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील, मदन भिसे, नवनाथ काळे, वसंत उफाडे, धनराज दाताळ, तात्यासाहेब देशमुख, ज्ञानेश्वर पवार, भैरू कदम आदी उपस्थित होते.