लातूर : रेणापूर तालुक्यातील पानगावच्या पन्नगेश्वर साखर कारखान्याच्या कामगारांनी मागील चार वर्षांपासूनचा थकीत पगार, ग्रॅच्युईटी व भविष्य निर्वाह निधीची संपूर्ण रक्कम मिळावी, या मागणीसाठी सुरू केलेले बेमुदत साखळी उपोषण शनिवारी (ता. ३१) १८ व्या दिवशी मागे घेतले. पन्नगेश्वर शुगर चालविण्यास घेतलेल्या विमल ॲग्रोच्या संचालकांशी झालेल्या चर्चेत कारखाना व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यंदा गळीत हंगाम सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पानगाव (ता. रेणापूर) येथील पन्नगेश्वर कारखाना दोन वर्षांपासून बंद पडला होता. कारखान्यात कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार थकला होता. कारखाना डबघाईस आल्याने तो विक्रीकरिता काढला होता आणि विक्रीस निघालेला कारखाना केजच्या आमदार नमिता मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वाखालील विमल ॲग्रो लिमिटेडने विकत घेतला. पूर्वीच्या मालकाने कारखाना विकला आणि घेणारा मालक नवीन आल्याने या कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा थकीत पगार, ग्रॅच्युईटी व भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न निर्माण झाल्याने कामगार व कर्मचारी चिंतेत होते.
थकीत वेतन व इतर रक्कम मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी १४ मेपासून कारखान्याच्या गेटसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते, जुने व नवे व्यवस्थापन आंदोलनाची दखल घेत नसल्याने मंगळवारी (ता. तीन) कारखान्यासमोर पानगाव-रेणापूर हायवेवर कर्मचारी सहकुटुंब रास्ता रोको आंदोलन करणार होते. परंतु, शनिवारी (ता. ३१) विमल अँग्रोच्या व्यवस्थापनाने कारखान्यात येत पूजा करीत श्रीफळ फोडून कामाचा शुभारंभ करीत कारखाना ताब्यात घेतला..
गोपीनाथराव मुंडे यांनी परिसरातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कारखान्याची उभारणी केली होती. तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करणार असल्याचे नवीन व्यवस्थापनाने सांगितले. या चर्चेनंतर सर्व कर्मचाऱ्यांनी १८ दिवसांपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण आणि प्रस्तावित रास्ता रोको आंदोलन स्थगित केले. विमल ॲग्रोने रीतसर कारखाना ताब्यात घेऊन कामाला सुरवात केल्याने कारखाना येत्या गळीत हंगामाला सुरवात करणार असल्याने उसाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. १८ दिवसांपासून कारखान्याच्या गेटसमोर शेकडो कर्मचारी आंदोलन करीत असल्याने कारखान्याचा ताबा घेत असताना काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विमल ॲग्रोने खबरदारी म्हणून रेणापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक डी. एस. निकम यांच्या देखरेखेखाली पोलिस उपनिरीक्षक दोन, महिला पोलिस उपनिरीक्षक एक, पोलिस शिपाई २५, महिला पोलिस शिपाई १५, आरसीपी प्लॉटून २० असा मोठा पोलिस बंदोबस्त लावला होता.