लातूर : वैशालीनगर-निवळी येथे विलास सहकारी साखर कारखान्यामध्ये शुक्रवारी कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या पूजनानंतर आढावा बैठकीत ९ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती चेअरमन वैशालीताई देशमुख यांनी दिली. आगामी हंगामासाठी कारखान्याकडे सभासदांच्या १४ हजार ८९३.३७ हेक्टर आणि बिगर सभासदांच्या ५ हजार ७९० हेक्टर, अशा एकूण २० हजार ६८७ हेक्टर उसाची नोंदणी झाली आहे, ज्यामुळे पुरेसा ऊस उपलब्ध आहे. यंत्रसामग्रीची देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार अमित देशमुख आणि चेअरमन वैशालीताई देशमुख यांनी कारखाना कार्यक्षेत्रात यंदा उसाचे मोठे क्षेत्र उपलब्ध असल्याने गळीत हंगाम लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या. कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी सांगितले की, साखर कारखान्याने ऊस तोडणीचे योग्य नियोजन केले आहे. या हंगामात जास्तीत जास्त ऊस हा तोडणी यंत्राद्वारे तोडला जाईल. पहिल्या टप्प्यात कारखान्यामार्फत १५ हार्वेस्टर खरेदी केले जाणार आहेत. भविष्यात १०० टक्के ऊसतोडणी यंत्राद्वारे करण्यासाठी आवश्यक असणारी मशिनरी बसविण्यात येत आहे. कार्यक्रमास माजी आ. व्हा. चेअरमन वैजनाथराव शिंदे, विजय देशमुख, संजीव देसाई, डॉ. सारिका देशमुख, माजी व्हा. चेअरमन संचालक रवींद्र काळे, संचालक रणजीत पाटील, अनंत बारबोले, रसूल पटेल, तात्यासाहेब पालकर, गोवर्धन मोरे, हणमंत पवार, नरसिंग बुलबुले, नेताजी साळुंके, नितीन पाटील, रामराव साळुंके, अमृत जाधव आदी उपस्थित होते.