लातूर : निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याकडून आगामी हंगामात नऊ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध आहे. सभासदांच्या चौदा हजार ८९३ हेक्टर तर बिगर सभासदांच्या पाच हजार ७९० हेक्टर अशा एकूण वीस हजार ६८७ हेक्टर उसाची नोंदणी झाली आहे, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा वैशाली देशमुख यांनी दिली. मागील गळीत हंगामाप्रमाणेच येणारा हंगामही यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. कारखान्याकडून येत्या गळीत हंगामाची जय्यत तयारी सुरू झाली आहे असेही त्यांनी सांगितले. कारखान्यात मिल रोलर पूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी सांगितले की, कारखान्याने ऊस तोडणीचे योग्य नियोजन केले असून, या हंगामात जास्तीत जास्त ऊस हा तोडणीयंत्राद्वारे तोडणी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कारखान्यामार्फत १५ हार्वेस्टर खरेदी केले जाणार आहेत. उसाची उपलब्धता पाहता, शंभर टक्के ऊस तोडणी यंत्राद्वारे केल्यानंतर उसाचे गाळप करण्यासाठी आवश्यक असणारी मशिनरी बसविण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे कारखाना बंद तास कमी राहतील, याची दक्षता घेतली जाणार आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार वैजनाथ शिंदे, विजय देशमुख, डॉ. सारीका देशमुख, रवींद्र काळे, संचालक सर्वश्री रणजित पाटील, अनंत बारबोले, रसूल पटेल, तात्यासाहेब पालकर, गोवर्धन मोरे, हणमंत पवार, नरसिंग बुलबुले, नेताजी साळुंके, नितीन पाटील, रामराव साळुंके, अमृत जाधव, सतीश शिंदे, दीपक बनसोडे, लताबाई देशमुख, श्याम बरुरे, सुभाष माने, रमेश देशमुख उपस्थित होते.