बुरहानपूर / जळगाव : ऊस आणि साखर उत्पादनात महाराष्ट्र हे खूप प्रगत राज्य आहे. राज्याच्या विकासात साखर उद्योगाने खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण असे असूनही, महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी ऊस खरेदीसाठी मध्य प्रदेश सरकारकडे मदत मागितली आहे. मध्य प्रदेशला लागून असलेल्या महाराष्ट्रातील रावेर तालुक्यातील शेतकरी ऊस लागवड करतात, परंतु येथील दोन मोठे साखर कारखाने बंद झाले आहेत, त्यामुळे त्यांचा ऊस विकला जात नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आता मध्यप्रदेश सरकारला ऊस खरेदीसाठी साकडे घातले आहे. आमचा ऊस पिक खरेदी करावा, त्याला योग्य किंमत द्यावी आणि वाहतुकीत कोणतीही अडचण येऊ नये याची दक्षता घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रावेरमधील शेतकरी दिगंबर चौधरी यांनी सांगितले की, आम्ही अनेक वर्षांपासून ऊस लावत आहोत. पण रावेर आणि फैजपूर येथील आमचे साखर कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे आता आम्हाला बुरहानपूरमधील झिरी येथील साखर कारखान्याला आमचा ऊस पाठवायचा आहे. आमचा ऊस तिथे खरेदी करावा, चांगला भाव मिळावा आणि सरकारने अनुदान द्यावे, अशी आमची मागणी आहे. आमच्या भागात ५०० हून अधिक शेतकरी ऊस पिकवतात. आम्हीही ऊस उत्पादक शेतकरी आहोत. मध्य प्रदेश सरकार तेथील स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देत असलेली सवलत आपल्यालाही मिळाली पाहिजे. आम्हाला आमचा ऊस बुरहानपूर येथील साखर कारखान्याला विकायचा आहे. महाराष्ट्रातील कारखाने बंद झाल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे, असे त्यांनी सांगितले.