पुणे : साखर आयुक्तालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात 11 डिसेंबर 2025 अखेर 336.43 लाख टन उसाचे गाळप, 278.39 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 8.27 टक्के आहे. राज्यात 91 सहकारी आणि 93 खाजगी अशा एकूण 184 कारखान्यांनी हंगाम सुरु केला आहे. मागील हंगामात याच कालावधीत 95 सहकारी आणि 95 खाजगी अशा एकूण 190 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केला होता. मागील वर्षी याच काळात 177.33 लाख टन उसाचे गाळप होऊन 139.98 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. सरासरी साखर उतारा 7.89 टक्के इतका होता.
ऊस गाळपामध्ये पुणे तर साखर उत्पादनात कोल्हापूर विभागाची आघाडी…
कोल्हापूर विभागाने 77.58 लाख टन उसाचे गाळप करून 74.88 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कोल्हापूर विभागाचा उतारा 9.65 टक्के इतका आहे. विभागात 23 सहकारी आणि 12 खासगी असे 35 कारखाने सुरु आहेत. अनेक साखर कारखान्यांनी गाळप झालेल्या उसासाठी पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे. पुणे विभागात 17 सहकारी आणि 12 खाजगी असे एकूण 29 कारखाने सुरु आहेत. त्यांनी आतापर्यंत 80.08 लाख टन उसाचे गाळप करून 69.28 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. पुणे विभागाचा उतारा 8.65 टक्के आहे.
सोलापूर विभागात तब्बल 41 आणि अहिल्यानगर विभागात 25 कारखाने सुरु…
सोलापूर विभाग ऊस गाळपात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात 14 सहकारी आणि 27 खाजगी असे एकूण 41 कारखाने सुरु आहेत. आतापर्यंत विभागात 71.03 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून 52.82 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. विभागाचा उतारा 7.44 टक्के इतका आहे. अहमदनगर (अहिल्यानगर) विभाग ऊस गाळपात चौथ्या क्रमांकावर आहे. या विभागात 14 सहकारी आणि 11 खाजगी असे एकूण 25 कारखाने सुरु झाले आहेत.या सर्व कारखान्यांनी आतापर्यंत 40.92 लाख टन उसाचे गाळप करून 31.29 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. अहमदनगर विभागाचा साखर उतारा 7.65 टक्के आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड विभाग अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात 12 सहकारी आणि 9 खाजगी अशा एकूण 21 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. त्यांनी 31.26 लाख टन उसाचे गाळप करून 21.9 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर उतारा 7.01 टक्के इतका आहे.
नांदेड विभागात 25.32 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन…
नांदेड विभागात 10 सहकारी आणि 19 खाजगी असे एकूण 29 कारखाने सुरु असून त्यांनी 32.05 लाख टन उसाचे गाळप करून 25.32 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 7.9 टक्के इतका आहे. अमरावती विभागात 1 सहकारी 3 खाजगी कारखाने सुरु असून 3.51 लाख टन उसाचे गाळप करून 2.9 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 8.26 टक्के आहे. नागपूर विभागात अद्याप एकही कारखाना सुरु झालेला नाही.


















