पुणे : नुकत्याच संपलेल्या ऊस गळीत हंगामात ऊस आणि साखरेचे उत्पादन घटल्याचे दिसून आले. त्याशिवाय अनेक साखर कारखान्यांना एफआरपी देण्याच्या अडचणीही भेडसावत आहेत. ऊस गळीत हंगामात सुमारे २०० साखर कारखान्यांनी गाळप घेतले आणि ८५४ लाख टन गाळप केले. तर उसाच्या एफआरपीबाबत साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या ऊस गळीत हंगामात राज्यातील १०८ साखर कारखान्यांनी देय एफआरपीच्या १०० टक्के किंवा त्यापेक्षा जादा रक्कम दिली आहे. त्यातही तब्बल ९७ साखर कारखान्यांनी एफआरपीच्या रकमेपेक्षा जादा बिले दिली आहेत.
यंदा उसाअभावी हंगाम लवकर गुंडाळला गेला. त्यामुळे साखर उद्योगात चिंतेचे वातावरण होते. मात्र आगामी हंगाम चांगला जाण्याची आशा आहे. पस्तीसहून अधिक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी थकवली आहे. तर एकूण ९२ साखर कारखान्यांकडे ८६४ कोटींची थकबाकी आहे. ज्या साखर कारखान्यानी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जादा पैसे दिले आहेत, त्यामध्ये १० लाख ते ८४ कोटी अशी रक्कम समाविष्ट आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याने एफआरपीपेक्षा सर्वाधिक जादा ८४ कोटी रुपये दिले आहेत. उदगिरी शुगरनेही एफआरपीपेक्षा जादा दर देण्याची परंपरा टिकवून ठेवली आहे.