पुणे : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या वापरातून खर्चात होणारी बचत आणि वाढणारी उत्पादकता बारामती कृषी विज्ञान केंद्रात यशस्वी झाली आहे. राज्यात हा प्रयोग सर्वदूर करण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प सहकारी साखर कारखान्यांत राबविण्यावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) प्रमुख संचालकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रविवारी (दि. १) शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आणि बारामती कृषी विज्ञान केंद्रात त्रिपक्षीय करार करून प्रत्यक्षात या कारखान्याच्या प्रक्षेत्रावर एआय तंत्रज्ञानाद्वारे ऊस लागवड आणि प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत.
‘व्हीएसआय’चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली साखर संकुलमधील महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या सभागृहात रविवारी दुपारी बैठक झाली. ऊस शेतीत एआय तंत्रज्ञान वापराबाबत पुढील सोमवारी (दि. ९) मांजरी येथील व्हीएसआयच्या मुख्यालयात प्रमुख सहकारी आणि खासगी कारखान्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे.
राज्य सहकारी बँकेने अडचणीतील साखर कारखान्यांना मदत करावी, अशी मागणी बैठकीत साखर उद्योगाकडून करण्यात आली. त्या वेळी यापूर्वी एफआरपीची रक्कम देण्यासाठी दिलेली रक्कम कुठे गेली? याचा प्रथम हिशेब द्यायला हवा. त्यावरही विस्तृत चर्चा झाली. काही कारखान्यांनी दिलेल्या कर्ज रकमेचा विनियोग त्याच कारणासाठी करीत नसल्याचा मुद्दाही काही कारखाना प्रतिनिधींनीच मांडल्याचे समजते. बैठकीमध्ये ऊस शेतीत एआय तंत्रज्ञान वापराबरोबरच साखरेपासून पॉली लॅक्टिक अॅसिड (पीएलए) हा प्लास्टिकसारखा पदार्थ तयार करण्यावरही सादरीकरण करण्यात आले. त्यासाठी काही कंपन्यांचेही प्रतिनिधी उपस्थित होते. दुधापासूनच्या पनीरनिर्मितीनंतर शिल्लक राहणाऱ्या दुग्धजन्य घटकांपासूनही इथेनॉल निर्मिती करण्यावरही सादरीकरण झाले.