सांगली : ऊस वाहतूकदार हा शेतकरीच आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बरोबर ऊस वाहतूकदारांची कर्जमाफी व्हावी. ती कर्जमाफी शासनाच्या ट्रेझरीवर न बोजा टाकता फसव्या मुकादमांच्या इस्टेटवर बोजा चढवून करावी. ऊस वाहतूकदारांना ऊसतोड कामगार गोपीनाथराव मुंडे महामंडळामार्फत असो किंवा ऊस साखर कारखानदारांकडून किंवा शासनाकडून ऊस तोडी कामगार पुरविण्यात यावेत यांसह ऊस वाहतूकदारांच्या विविध प्रश्नांसाठी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन केले जाईल, अशा इशारा महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू पाटील यांनी दिला.
सरकारने ऊस वाहतूकदारांसाठी नवीन महामंडळ स्थापन करावे अशी मागणी करून राजू पाटील म्हणाले की, ऊस व्यवसायामध्ये फक्त ऊस वाहतुकीचाच करार करून घेण्यात यावेत. ऊस उतरवला की, लगेच वाहतूक व कमिशन जमा करावी. वाहतूकदारांच्या वाहनासाठी कारखान्याकडून डिझेल घेण्याची सक्ती करू नये. फसवणूक केलेल्या मुकादमांच्या घरी किंवा गावांत गेल्यानंतर ऊस वाहतूकदारांवर विनयभंग, अॅट्रॉसिटी, किडनॅपिंगचे गुन्हे दाखल केले जातात. असे खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत. फसवणुकीची रक्कम वसुलीला पोलिसांनी सहकार्य करावे. ऊस वाहतूकदारांकडून कारखानदार करारावेळी कोऱ्या कागदावर व चेकवर सह्या करून घेऊ नयेत. जोवर फसव्या मुकादमांकडील पैसे वसूल होत नाही तोपर्यंत कारखानदारांनी वसुली करू नये अशा आमच्या मागण्या आहेत.


















