महाराष्ट्र – एकरी ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या वापर हेच उत्तर : शरद पवार

पुणे : एकरी ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या तंत्रज्ञानाच्या वापर हेच उत्तर आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील काही कारखान्यांकडून साखरेबरोबरच इथेनॉल, कापड असे उपपदार्थही तयार केले जातात. त्यामुळे आपल्या कारखान्यांनी साखरेव्यतिरिक्त अन्य उपपदार्थ तयार करण्यास प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मांजरीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) मुख्यालयात सोमवारी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. ‘एआय’मुळे ऊस पिकासह शेतीचे अर्थकारण बदलून शेतकर्‍यांचे जीवनमान सुधारेल. एआय तंत्रज्ञान ऊस शेतीमध्ये ‘गेमचेंजर’ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात ‘व्हीएसआय’ आणि बारामतीतील अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यामध्ये ऊस शेतीत एआय वापरावर सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ व वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) यांनीही संयुक्तपणे आयोजनात सहभाग घेतला. एआय तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी राज्य सहकारी साखर कारखाना संघ, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा), राज्याच्या कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्रानीही महत्त्वाची भूमिका पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, व्हीएसआयचे विश्वस्त आमदार जयंत पाटील, नवी दिल्लीतील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, ज्येष्ठ नेते जयप्रकाश दांडेगावकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here