मुंबई : राज्यातील ऊस तोडणी मजुरांसाठी गोपीनाथ मुंडे विकास महामंडळ १३ सप्टेंबर २०१९ रोजी स्थापना झाले तर संत भगवान बाबा वसतिगृह योजना ११ जानेवारी २०२१ रोजी जाहीर झाली. मात्र अद्याप एकही वसतिगृह सुरू झालेले नाही. भाड्याने इमारत घेतली असून यावर्षी हॉस्टेल सुरू होईल, असे सांगण्यात येते. त्यामुळे चालू वर्षीदेखील मुलांना अंधारात भविष्य ठेवावे लागणार आहे, असेच चित्र दिसत असल्याचे ऊस क्षेत्रातील अभ्यासक डॉ. सोमीनाथ घोळवे यांनी म्हटले आहे.
ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी अनेक वर्ष रेंगाळत असलेला शिक्षणाचा प्रश्न सरकार कधी सोडवणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ॲग्रोवनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सोमीनाथ घोळवे यांनी म्हटले आहे की, नव्या शैक्षणिक वर्षात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू होत आहेत. मात्र ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी हॉस्टेल सुरू करण्यासाठी मुहूर्त सापडत नाही.