अहिल्यानगर : ऊस शेतकऱ्यांसाठी आधुनिक पद्धतीची गरज आहे. ठिबक सिंचनासह नव्या तंत्रज्ञानाचा वापर आता अनिवार्य आहे. एकरी १०० टनांहून अधिक ऊस उत्पादनासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन माजी कृषीमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. वाघापूर (ता. संगमनेर) येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित ऊस विकास मेळाव्यात ते बोलत होते. ऊस विशेष तज्ज्ञ सुरेश माने प्रमुख पाहुणे होते. ऊस लागवड जून महिन्यात एकत्र केल्यास तोडणीस अडचणी निर्माण होतात. त्यामुळे टप्प्याटप्प्याने लागवड होणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी यावर भर देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
ऊस तज्ज्ञ सुरेश माने यांनी ऊस लागवडीची आधुनिक पद्धत योग्य वाणांची निवड, खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण व फवारणी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. जास्त पाण्यापेक्षा पाण्याचे नियोजन महत्त्वाचे आहे. ठिबक सिंचनाचा वापर करून हुमणी अळीचा प्रादुर्भावही कमी करता येतो असे ते म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, नानासाहेब शिंदे, संचालक संपत गोडगे, विनोद हासे, सतीश वर्पे, डॉ. तुषार दिघे, रामदास धुळगंड, गुलाब देशमुख, अरुण वाकचौरे, अंकुश ताजणे, रामनाथ कुटे, योगेश भालेराव, दिलीप नागरे, विलास शिंदे, बाबासाहेब गायकर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व कृषी अधिकारी भाऊसाहेब खर्डे आदी उपस्थित होते. या मेळाव्यानंतर पिंपरणे, शेडगाव, शिबलापूर व पानोडी येथेही ऊस विकास मेळावे झाले. या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.