माळेगाव कारखाना रणधुमाळी : सत्तारुढ संचालकांनी कारखाना कर्जाच्या खाईत लोटल्याचा माजी अध्यक्ष रंजन तावरे यांचा आरोप

पुणे : मागील पाच वर्षांत सत्ताधारी संचालक मंडळाने माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे वाटोळे केले आहे. डिस्टिलरीवर तीन पट कर्ज उचलले. सत्ताधारी संचालक मंडळाच्या अनेक चुकांमुळे कारखाना कर्जबाजारी झाला आहे. कारखान्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. अशातच अलीकडच्या काळामध्ये सहकारी साखर कारखानदारीचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. तशाच पद्धतीने माळेगाव कारखान्याची निवडणूक म्हणजे खासगीकरणाविरुद्ध सहकारीकरणाची लढाई आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी केले. कारखाना निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते.

तावरे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प अकरा वेळा मांडल्याचे सांगितले आहे. पण कारखान्यात ते सत्ताधारी संचालक मंडळाच्या चुकीच्या आकडेवारीवर विश्वास ठेवून संचालक मंडळाला पाठीशी घालत आहेत. उपमुख्यमंत्री स्वतः माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत उभे राहिले आहेत. ते चेअरमनपदी विराजमान होण्याचे स्वप्न पाहत आहेत. मात्र सभासद सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. कारखान्याच्या निवडणुकीची लढाई ही परिवर्तनाची लढाई आहे. सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून सहकारी साखर कारखानदारी वाचवली पाहिजे. मागील पाच वर्षांत सत्ताधारी संचालक मंडळाने चुकीचे निर्णय घेत सभासदांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. कारखान्याला वेगवेगळी देणी आणि सभासदांचे हक्काचे पैसे देण्यासाठी त्यांना पतसंस्थांच्या ठेवी रूपातील कर्ज घ्यावे लागते यासारखे दुसरे दुर्दैव कोणते असा सवाल रंजन तावरे यांनी केला.

विरोधकांकडून अपप्रचार, माळेगाव कारखाना सहकारीच राहणार : अजित पवार

माळेगाव साखर कारखान्याबाबत विरोधक अपप्रचार करीत आहेत. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत कारखाना सहकारीच राहिल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना निवडणुकीत मळद (ता. बारामती) येथे सोमवारी नीळकंठेश्वर पॅनेलच्या प्रचार सभेत ते बोलत होते. कारखाना प्रशासनाचा एक रुपयाही खर्च न करता माळेगाव व शिवनगरचा विकास तुम्हाला पाहायला मिळेल. माळेगावच्या सभासदांनी माझ्या उमेदवारीसह निळकंठेश्वर पॅनेलच्या उमेदवारांना मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. विरोधकांना विस्मरण होत आहे अशी टीकाही त्यांनी केली.

अजित पवार म्हणाले म्हणाले, पुणे जिल्हा बँक, बारामती मार्केट कमिटी, दूध संघ आणि खरेदी विक्री संघ आदी सहकारी संस्था राज्यात अग्रगण्य ठरल्यात. या सहकारी संस्था माझ्या नेतृत्वाखाली चालतात. या संस्थांच्या आर्थिक शिस्तीबाबत सहकारातील तज्ज्ञ समाधान व्यक्त करतात. मी ११ वेळा महाराष्ट्रातील १३ कोटी लोकांचा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यामुळे माळेगाव कारखान्यावर अवलंबून असलेल्या सव्वालाख लोकांच्या घरात आर्थिक संपन्नता मी आणू शकतो. विरोधक विनाकारण सभासदांना सहकार मोडीत निघण्याची भीती दाखवतात. ‘माळेगाव’ची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून अजित पवार आमच्याकडे माणसे पाठवत होते. हा विरोधकांचा दावा खोटा आहे. याबाबत बोलायचेच असते, तर मी थेट बोललो असतो. ही माझी कृती छत्रपती कारखान्यात लोकांनी अनुभवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here