पुणे : माळेगाव साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये राज्यात उच्चांकी असा ३ हजार ६३६ रुपये प्रतिटन ऊस दर दिला आहे, तर गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये देखील २०० रुपये कांडेबिलासह ३ हजार ३३२ रुपये प्रतिटन सभासदांना दिले आहेत. कारखान्याची आर्थिक परिस्थिती भक्कम असून विरोधकांच्या भूलथापांना सभासद बळी पडणार नाहीत, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष ॲड. केशवराव जगताप यांनी केले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांची प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अशावेळी विरोधकांकडून कारखान्यावर कर्ज असल्याच्या आरोपांना अध्यक्ष ॲड. जगताप यांनी प्रचार सभेत उत्तर दिले. मागील पंचवार्षिक निवडणुकीत विरोधकांची सत्ता सूज्ञ सभासदांनी उलथून टाकली. त्यानंतर विरोधक पाच वर्षांत एकदाही कारखान्यावर फिरकले नाहीत, यावरूनच त्यांना सभासदांचा किती कळवळा आहे याचा अंदाज येतो, असा टोला ॲड. केशवराव जगताप जगताप यांनी चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांचे नाव न घेता लगावला.
विरोधकांनी २०२० मध्ये सत्ता सोडली तेव्हा मार्चअखेर कारखान्यावर ४४४ कोटी ६२ लाख कर्ज होते तर ३१ मार्च २०२५ अखेर ३८४ कोटी ४ लाख इतके कर्ज दिसून येते. यामध्ये मध्य मुदत कर्ज, साखर तारण कर्ज व्यवहारांचा समावेश आहे. त्यामुळे माळेगावची आर्थिक परिस्थिती भक्कम असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात उच्चांकी ऊस दर देऊ शकलो, असे ॲड. जगताप म्हणाले.
पाच वर्षात १०२ कोटी भांडवली गुंतवणूक केली. त्यासाठी केवळ २० कोटी १८ लाख इतके मध्यम मुदत कर्ज घेतले. त्यातून फॅक्टरी शेड, साखर गोदाम, ईटीपी व एसटीपी प्लांट, हार्वेस्टरसाठी टिपलर टेबल, शुगर सिरप क्लेरिफायर, डस्ट कॅचर, डिस्टिलरी सीपीयू आदी कारखान्यासाठी आवश्यक प्रकल्प पूर्ण केले, परिणामी माळेगाव कारखान्याने गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये कारखाना इतिहासातील १५ लाख २६ हजार मेट्रिक टन ऊस गाळपचा विक्रम प्रस्थापित केला. कामगारांच्या रजेचा पगार साडेतीन कोटी दिला. वेतनवाढ धोरणानुसार कामगारांना फरकाची रक्कम ६ कोटी ८८ लाख अदा केली. हे सर्व करीत असताना माळेगावने ऊस दरावर कधीही परिणाम होऊ दिला नाही, असेही ॲड. केशवराव जगताप यांनी सांगितले.