नांदेड – भाऊराव चव्हाण कारखान्याच्या वादळाचा फटका : दोन्ही युनिट्सना मिळून ५० लाखांचे नुकसान

नांदेड : नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या दोन युनिट्सवर सोमवारी (ता.९) सायंकाळी वादळाचा फटका बसला. छतावरील पत्रे उडून गेले, विजेचे खांब उन्मळून पडले, तसेच परिसरातील झाडेही उन्मळून पडली आहेत. अर्धापूर तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील युनिट क्र. १ मध्ये कारखान्यावरील पत्रे उडाल्यामुळे अंदाजे १५ लाख रुपये आणि आसवनीवरील पत्रे उडाल्यामुळे अंदाजे १० लाख रुपये असे एकूण २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद आहे.

कळमनुरी (जि. हिंगोली) तालुक्यातील डोंगरकडा येथील युनिट क्र. २ मध्ये कारखान्याच्या मुख्य छतावरील पत्रे उडाल्यामुळे अंदाजे २३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या वादळात युनिट परिसरातील कामगार वसाहतीमधील काही घरांचे पत्रेही उडाले असून, विजेच्या खांबांचे मोठे नुकसान झाले. वादळात अनेक झाडे उन्मळून पडल्याने परिसरात अडथळे निर्माण झाले आहेत. दोन्ही युनिट्स मिळून अंदाजे ५० लाख रुपयांचे एकूण नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. नुकसानग्रस्त भागातील पाहणी आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाकडून मदत व पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here