नांदेड : हदगाव तालुक्यातील हस्तरा येथील येथील युवक सागर फुले यांनी २०२१ मध्ये गूळ कारखाना उभारला. या भागात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी आहेत. मात्र, विजेच्या समस्येसह अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती असूनही कारखान्याची वाटचाल चालू आहे. या गुळ कारखान्यातून शंभरावर कुटुंबाना रोजगार मिळाला असून, परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी सोय झाली आहे. येथील गुळाला महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तेलंगाना, गुजरात आणि छत्तीसगडमध्ये मोठी मागणी आहे. चांगला दर व ऊस गाळपाची अन्य सोय नसल्याने परिसरातील दहा खेड्यांतील शेतकऱ्यांना या कारखान्याचा फायदा होत आहे.
याबाबत सागर फुले यांनी सांगितले की, यंदा फेब्रुवारी अखेरपर्यंत गूळ कारखान्यातून सव्वा पाच हजार टन उस गाळप होऊन गूळ निर्मितीसाठी तयार होईल. पुढील वर्षी विजेच्या समस्येतून मुक्त करण्याचे प्रयत्न चालू असतील. यावर्षी गुळाला सत्तावीसशे रुपये भाव मिळाला. परिणामी ५००० टन उसाचे गाळप गुळ निर्मितीसाठी झाले आहे. गेल्यावर्षीपेक्षा एका भट्टीची वाढ करण्यात आली आहे. गुळ कारखान्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील साठ कुटुंबांना येथे ऊसतोड व वाहतुकीचे काम चार महिने मिळते. शिवाय, गावातील पाच ट्रॅक्टर चालकांना ऊस वाहतुकीचे काम मिळते. पाच जण गुळ विक्रीतून कुटुंबाला आधार देतात. उत्तर प्रदेशातील पन्नासवर कुटुंबांचाही यावर उदर-निर्वाह होत आहे.


















