नाशिक : विठेवाडी (ता. देवळा) तालुक्यातील बंद पडलेला वसंतदादा सहकारी साखर कारखाना चालू करण्यासंदर्भात राज्य शिखर बँकेने पंधरा दिवसांत निर्णय घ्यावा,अन्यथा बँकेच्या नाशिक कार्यालयासमोर बिऱ्हाड आंदोलन करण्याचा इशारा देत कामगारांनी बेमुदत उपोषण बुधवारी (ता. २५) सायंकाळी मागे घेतले. बुधवारी देवळा शिवस्मारकाजवळ कारखान्यातील आजी–माजी कामगार, महिला व सभासदांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. मागील आठवड्यातही काही मोजक्या कामगारांनी शिवस्मारकाजवळील पायऱ्यावर मुंडण करून धरणे आंदोलन केले होते. लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवत दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत, कामगार, महिला, सभासदांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले.
‘वसाका’ची पाचशे कोटींची मालमत्ता धूळखात असून एकवीस महिन्यांपासून बंद असलेल्या कारखान्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारखाना पुन्हा सुरळीत सुरू व्हावा व थकित वेतन मिळावे या मागणीसाठी शशीकांत पवार, कामगार संघटनेचे माजी कार्याध्यक्ष कुबेर जाधव, जमीनधारक शेतकरी नानाजी पवार, दोधा पवार, अण्णा गुंजाळ, मुन्ना शिंदे, सुनील आहीरे, संजय देशमुख, संजय जगताप, विनायक जाधव, गणू शिंदे, बापू देशमुख, सुभाष निकम आदी सभासद व कामगार तसेच महिला उपोषणास बसले होते. यावेळी सभापती योगेश आहेर, ‘प्रहार’चे गणेश निंबाळकर यांनी आपले विचार मांडले. सायंकाळी पाच वाजता सर्व कामगारांनी एकजूट दाखवत शिखर बँकेने येत्या पंधरा दिवसांत कारखाना सुरू करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा कामगार बँकेच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढतील, असा पवित्रा घेत तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन देऊन उपोषण मागे घेतले.