कृषी समुदायासाठी सन्मान तसेच समृद्धीचा महत्वाचा टप्पा गाठत गेल्या 11 वर्षांत सरकारने राबवलेल्या शेतकरी-हिताच्या उपक्रमांचा सर्वदूर पोहोचलेला परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केला आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी तसेच किसान पीक विमा यांसारख्या महत्त्वाच्या उपक्रमांवर भर देऊन शेतकरी कल्याणासाठी सरकारने उचललेली अत्यंत महत्वाची पावले असे याचे वर्णन त्यांनी केले.
किमान हमीभावात (एमएसपी) सातत्याने वाढ केल्यामुळे देशाच्या अन्नधान्य उत्पादकांना त्यांच्या पिकांसाठी योग्य भाव तर मिळालाच आणि त्याचबरोबर त्यांच्या उत्पन्नात सुद्धा वाढ झाली याकडे देखील पंतप्रधानांनी निर्देश केला.
देशातील कष्टाळू शेतकऱ्यांची सेवा करणे हे आपल्या सरकारसाठी विशेषाधिकारासारखे आहे असे मोदी यांनी अधोरेखित केले. गेल्या 11 वर्षांतील सरकारच्या वाटचालीवर प्रकाश टाकत पंतप्रधान म्हणाले की या काळात सरकारने राबवलेल्या विविध उपक्रमांनी केवळ शेतकऱ्यांच्या समृद्धीला चालना दिली असे नव्हे तर त्यांनी कृषी क्षेत्रात समग्र परिवर्तन घडवून आणण्यात देखील योगदान दिले आहे.
सरकारने मृदा आरोग्य आणि सिंचन यांसारख्या महत्त्वाच्या पैलूंकडे विशेष लक्ष दिले आणि ते मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरले यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला.
येत्या काळात शेतकरी कल्याणासाठी आमचे प्रयत्न अधिक जोमाने सुरू राहतील, असे मोदी पुढे म्हणाले. आम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी सन्मान आणि समृद्धीसाठी काम केले आहे, असे देखील त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
“आपल्या शेतकरी बंधू-भगिनींना पूर्वी छोट्या गरजांसाठीही कर्ज घ्यावे लागत होते, परंतु गेल्या 11 वर्षात आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांचे जीवन खूप सुलभ झाले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी असो किंवा शेतकरी पीक विमा असो, आम्ही त्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. आता एमएसपीमध्ये सतत वाढ होत असल्याने, देशातील अन्न उत्पादकांना त्यांच्या पिकांना योग्य किंमत तर मिळत आहेच, शिवाय त्यांचे उत्पन्नही वाढत आहे.”