नवी दिल्ली : देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तूर्त वाढण्याची शक्यता नसल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.देशातील ऊर्जा साठ्याबाबत बोलताना सरकारी सूत्रांनी सांगितले की, पश्चिम आशियातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही भारतातील ऊर्जा साठा हळूहळू सुधारत आहे. अलीकडील आढाव्यांमधून सरकारला दिलासा मिळाला असून ऊर्जा साठ्यांची स्थिती मजबूत होत असल्याचे दिसत आहे.दरम्यान, एलपीजी (स्वयंपाक गॅस) दरवाढीबाबत काँग्रेसने केलेल्या आरोपांनाही सरकारने फेटाळून लावले. सूत्रांनी स्पष्ट केले की किमती वाढणार नाहीत हे आश्वासन फक्त पेट्रोल आणि डिझेलसाठी होते, एलपीजीसाठी नव्हते. त्यामुळे काँग्रेसचे आरोप निराधार असल्याचे त्यांनी म्हटले.
पुरवठा साखळीतील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन सरकारने हॉर्मूज सामुद्रधुनीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कच्च्या तेलाच्या आयातीचे स्रोत विविध केले आहेत. भारताने इतर मार्गांद्वारे कच्च्या तेलाची खरेदी वाढवली असून त्यामुळे पुरवठा स्थिर ठेवण्यास मदत होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताने हॉर्मूज सामुद्रधुनीव्यतिरिक्त इतर स्रोतांमधून कच्च्या तेलाच्या आयातीत सुमारे 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे आयातीच्या आकडेवारीतही बदल दिसून येत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्वी 60 टक्के कच्चे तेल हॉर्मूज सामुद्रधुनीव्यतिरिक्त इतर मार्गांनी आयात केले जात होते, ते प्रमाण आता वाढून सुमारे 70 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. (ANI)


















