नांदेड : ‘एफआरपी’मध्ये केलेल्या वाढीच्या तुलनेत खुल्या बाजारात विक्री करावयाच्या साखरेच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे सहकार क्षेत्रातील कारखानदारी अडचणीत आली असून, हे धोरण असेच राहिले, तर कारखाने बंद पडतील, अशी भीती यांच्यासमोर साखर कारखानदारांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासमोर व्यक्त केली. यावेळी मंत्री शहा यांनी कारखानदारांनी आपला हा मुद्दा कागदपत्रांवर व्यवस्थित मांडावा तसेच सनदी लेखापालाकडून जमा खर्चाचा संपूर्ण ताळेबंद तयार करून घ्यावा आणि पुन्हा चर्चेसाठी यावे, असे सांगितले.
गेल्या सोमवारी नांदेडमध्ये आलेले केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांची सहकारी व खासगी साखर कारखानदारांच्या एका शिष्टमंडळाने भेट घेतली. एका मुद्यावर शहा भडकल्याची बातमी ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केली आहे. बातमीत म्हटले आहे कि, खासदार अशोक चव्हाण, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, भाऊराव चव्हाण, साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण आणि खासगी साखर कारखानदार मारोतराव कवळे यांचा शिष्टमंडळात समावेश होता. या भेटीप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री अतुल सावे उपस्थित होते.
केंद्र सरकारने मागील तीन वर्षांत उसाच्या ‘एफआरपी’मध्ये केलेल्या वाढीच्या तुलनेत खुल्या बाजारात विक्री करावयाच्या साखरेच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे सहकार क्षेत्रातील कारखानदारी अडचणीत आली असून, हे धोरण असेच राहिले, तर कारखाने बंद पडतील, असे गाऱ्हाणे मांडले. मात्र शहा यांना हा मुद्दा खटकल्याचे दांडेगावकर यांनी सांगितले. चर्चेदरम्यान उसाची एफआरपी आणि बाजारातील साखेचे दर यातील मोठी तफावत मांडल्यानंतर शहा यांनी कारखानदारांनी आपला हा मुद्दा कागदपत्रांवर व्यवस्थित मांडावा तसेच सनदी लेखापालाकडून जमा खर्चाचा संपूर्ण ताळेबंद तयार करून घ्यावा आणि पुन्हा चर्चेसाठी यावे, असे सांगितले.