सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचा २५ वा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. चालू गळीत हंगामात कारखान्याने १४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर आज गळीत हंगामातील ३१ व्या दिवशी आजअखेर २ लाख ७० हजार २५० मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. कारखान्याने २ लाख २५ हजार ५४० इतके साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार मोहनराव कदम यांनी दिली.
अध्यक्ष कदम यांनी सांगितले की, कारखान्याचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार कारखान्याची वाटचाल सुरू आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. कारखान्याचा सरासरी साखर उतारा ११.६० टक्के आहे. कारखान्याची प्रतिदिन ९ हजार ५०० मेट्रिक टन इतकी गाळप क्षमता वाढविण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या प्रतिदिन ९ हजार ५०० मेट्रिक टन इतके उसाचे गाळप सुरू आहे. तर अजूनही प्रतिदिन गाळप वाढणार आहे. तसेच कारखान्याचे सहवीज निर्मिती आसवनी व इथेनॉल आदी उपपदार्थ निर्मिती प्रकल्पही पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.


















