पुणे : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम गतीने सुरू आहे. आतापर्यंत हंगामात सहभागी असलेल्या १५ साखर कारखान्यांनी एकूण १०२ लाख ४२ हजार ८६५ टन उसाचे गाळप केले असून, त्यातून ९७ लाख ३ हजार ३८३ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ९.४७ टक्के इतका आहे. ऊस गाळपात बारामती ॲग्रो साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. बारामती ॲग्रोने आतापर्यंत १६ लाख ८५ हजार ४७ टन उसाचे गाळप करून १४ लाख ३८ हजार ९४५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून, हा कारखाना गाळपात आघाडीवर आहे. साखर उताऱ्यात सोमेश्वर साखर कारखाना प्रथम क्रमांकावर असून या कारखान्याचा उतारा ११.५४ टक्के आहे. प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
पुणे जिल्ह्यात बहुतांश साखर कारखान्यांना गाळप सुरू करण्यास काहीसा विलंब झाला होता. मात्र गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील गाळपाचा वेग समाधानकारक राहिला असून, कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस गाळपाचे नियोजन केले आहे. सध्या सुरू असलेल्या कारखान्यांमध्ये ९ सहकारी व ६ खासगी साखर कारखान्यांचा समावेश असून, या कारखान्यांची एकत्रित दैनंदिन गाळप क्षमता १ लाख २६ हजार टन इतकी आहे. खासगी साखर कारखाने ऊस गाळपात तर साखर उताऱ्यांच्या बाबतीत सहकारी साखर कारखाने सरस ठरत आहे. दरम्यान, जुलै महिन्यापासून शेतात पाणी साचून राहिल्याने उसाची अपेक्षित वाढ झाली नसून त्यामुळे उत्पादनात काही प्रमाणात घट झाल्याचेही जाणवते.

















