पुणे : जिल्ह्यातील साखर कारखान्यात बारामती अॅग्रो व दौंड शुगर या खाजगी कारखान्यांनी पाच लाख गाळपाचा टप्पा ओलांडत आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील बारामती अॅग्रोने ६ लाख ५८ हजार मे. टन उसाचे गाळप करून ४ लाख ७२ हजार क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन घेतले आहे. त्या खालोखाल दौंड शुगरने ५ लाख ४० हजार मे. टन उसाचे गाळप करून ३ लाख ८३ हजार पोत्याचे उत्पादन घेतले आहे तर २ लाख ७२ हजार मे. टन उसाचे गाळप करून २ लाख ७८ हजार साखर पोत्यांचे उत्पादन घेत सोमेश्वर कारखाना तिसऱ्या क्रमांकावर आहे. आजअखेर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सरासरी सव्वा आठ टक्के साखर उतरा ठेवत २९ लाख ३३ हजार ७२० टन ऊस गाळप करत २४ लाख २१ हजार ४२० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन घेतले आहे.
चालू गळीत हंगामावर दृष्टिक्षेप टाकला असता जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले असले तरी कारखान्यांनी वाढवलेल्या स्वतःच्या गाळप क्षमतेमुळे या हंगामात उसाची पळवापळवी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे काही साखर कारखाने मार्च महिन्यातच बंद करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत ऊस गाळपास खासगी कारखान्यांनी आघाडी घेतली आहे, तर साखर उताऱ्यात सहकारी कारखान्यांनी बाजी मारली आहे. माळेगाव कारखाना आघाडीवर १०.४५ टक्केचा साखर उतारा ठेवत असून त्या खालोखाल १० ३९ टक्केचा साखर उतारा ठेवत सोमेश्वर कारखाना तर १०.२६ चा साखर उतारा ठेवत छत्रपती कारखाना तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याने उशिरा तुटणाऱ्या उसाला अनुदान जाहीर केले असून फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या उसाला प्रतिटन १०० रुपये, मार्चमध्ये तुटणाऱ्या उसाला २०० रुपये आणि एप्रिलमध्ये तुटणाऱ्या उसाला ३०० रुपये अतिरिक्त मिळणार आहेत.


















