पुणे : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या गळीत हंगामाची सांगता झाली आहे. या हंगामात कारखान्याने तीन लाख ९७३.८३० मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून तीन लाख ९ हजार ६७५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पामधून दोन कोटी ३७ लाख ११ हजार २०० युनिट वीज निर्मिती करून एक कोटी ४२ लाख ३० हजार ३० युनिट वीज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला निर्यात केली आहे. इथेनॉल प्रकल्पामधून रेक्टीफाईड स्पिरीट ४८ लाख ३६ हजार ५१४ लिटर्स व इथेनॉल ४१ लाख ५३ हजार ४१९ लिटर्स उत्पादित झाले. अद्याप इथेनॉल उत्पादन चालू आहे.
कारखान्याचा गळीत हंगाम साखर कारखान्याचे सर्व सभासद, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी व विशेषतः ऊस तोडणी कामगार, ऊस वाहतूकदार यांच्यामुळे यशस्वी झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवले यांनी दिली. हेक्टरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन वाढीसाठी कारखान्याच्या शेतकी विभागाच्या वतीने व वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी बु. व ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांच्या मार्फत गावोगावी शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती कार्यकारी संचालक एस. जी. पठारे यांनी दिली.
गळीत हंगाम सांगता समारंभाला कारखान्याचे संचालक धैर्यशील ढमाले, धोंडीबा भोंडवे, राजेंद्र कुदळे, दत्तात्रेय उभे, छबूराव कडू, विलास कातोरे, भरत लिम्हण, अतुल काळजे, शिवाजी कोळेकर, संचालिका ज्योती अरगडे, शोभाताई वाघोले, माजी तज्ज्ञ संचालक ज्ञानेश नवले तसेच प्र. सचिव मोहन काळोखे, चीफ इंजिनिअर रणजितसिंह जगदाळे, मुख्य शेतकी अधिकारी अजितकुमार सावंत, सुरेश सस्ते, सुदाम पवार, सुरेश वाळुंज, चंद्रकांत गायकवाड, ऊस पुरवठा अधिकारी हिरामण गोपाळे, प्रदीप सावंत, रवींद्र शिंदे, सत्यवान पवार, देविदास उभे आदींसह सर्व कर्मचारी, ऊस तोडणी मजूर, ऊस वाहतूकदार उपस्थित होते.


















