पुणे : ए.आय. तंत्रावर आधारित २४ महिन्यांच्या पीकपद्धतीचा अवलंब करण्याचा कृषीतज्ज्ञांचा सल्ला

पुणे : राज्यातील यंदाची पावसाची स्थिती पाहता कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रावर आधारित चोवीस महिन्यांच्या पीकपद्धतीचा अवलंब करणे फायदेशीर ठरेल, असा सल्ला बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रातील (केव्हीके) शास्त्रज्ञांनी दिला आहे. ‘एआय’ आधारित पूर्वहंगामी ऊस लागवडीचा पर्याय वापरल्यास साधारणपणे १२ महिन्यांमध्ये ऊस तोडणीसाठी योग्य होण्याचा अंदाज आहे. याशिवाय, ऊस उत्पादनामध्ये सुमारे ३० टक्के वाढीची शक्यता असून जमिनीच्या वाफसा स्थितीमध्ये आणि पिकाच्या गरजेप्रमाणे खतांचा पुरवठा केल्यामुळे उसाची वाढ सतत होऊन रासायनिक खतांमध्ये ३० टक्के, पाण्याची अंदाजे ४० टक्के बचत होते खताचा अतिरिक्त संचय टाळला जाईल. जमिनीची सुपीकता, उत्पादकता शाश्वत ठेवण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी ऊस तोडणीनंतर खोडव्याचे नियोजन एआय तंत्राने केल्यास उत्पादनात ३० टक्के वाढ आणि खर्चात बचत होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पुणे जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात सलग आठवडाभर अतिवृष्टी झाली. त्यामुळे आडसाली लागवडीचे वेळापत्रक कोमलडले आहे. परिणामी सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती अशा मोठ्या साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील जवळपास ६० हजार एकर क्षेत्रावरील आडसाली लागवडीसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या स्थितीत आडसाली ऊस उत्पादनापेक्षाही एआय आधारित २४ महिन्यांसाठी विकसित नवीन पीक पद्धती व ऊस उत्पादन वाढीचा पर्याय फायदेशीर ठरू शकतो, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. आडसाली उसाच्या लागवडीसाठी घाई न करता सध्याचा पाऊस थांबल्यावर जूनच्या पहिल्या पंधरवड्यात सोयाबीन, उडीद, वाघ्या घेवडा या पिकांची रुंद गादी वाफ्यावर पेरणी करावी. ती सप्टेंबर अखेरीस काढणी योग्य होतील. त्यानंतर पूर्वहंगामी ऊस लागवड करावी. या उसाची बारा महिन्यांत तोडणी झाल्यावर गहू, कांदा, उसाचा खोडवा घेता येईल. खोडवा पीक घ्यायचे झाल्यास नोव्हेंबर ते जानेवारी २०२७ पर्यंतचा कालावधी गृहीत धरता एआयने पहिल्या ऊस पिकाएवढी उत्पादकता गाठणे शक्य होईल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here